◾ dattuanna patil

पंगतीत मीठ वाढणारा परत येत नाही तसेच काही माणसं देखील आपल्या आयुष्यातून एकदा निघून गेले की परत येत नाहीत. बहुदा ते गेल्यावरच त्यांची किंमत कळते. असं का घडतं, कारण मीठाचं महत्व जेंव्हा पानात असतं तेंव्हा कळतच नाही कारण त्यावेळी माणसाचं लक्ष पानात येणाऱ्या गोड पदार्थावर असतं.

तो पदार्थ कुठला, कसा, त्याची चव कशी, तो चांगल्या तुपापासून बनवलाय का? ते खाऊन आपल्याला काही त्रास होऊ शकतो का? हे काहीच माहीत नसतं तरी देखील तो गोड पदार्थ हवासा असतो. कारण मोह.

असं म्हणतात की संकट हे नेहमी सुंदर रूप घेऊनच येतं. त्या गोड पदार्थाच्या मोहापायी ताटातल्या मिठाकडे जराही लक्ष जात नाही. कारण आपण त्याला कुठेतरी गृहीत धरायला लागतो, त्याचा खारटपणा नकोसा वाटतो. ते आपल्या पानातील इतर पदार्थात मिक्स होऊ नये म्हणून आपणच त्याला स्वतःहून बाजूला करतो. त्यात कधी वाटीतील रस्सा भाजी वगैरे सांडली तर ते पानात असून देखील उपयोग नसतो.

नको वाटतात ना आपल्या आयुष्यात अशी मिठासारखी माणसं? कारण ती तुमच्या चांगल्यासाठी परखड सल्ला देतात, कधी हक्काने कान धरतात, तर कधी पोटतिडकीने समजावून सांगतात. नकोशीच वाटतात, कारण त्यावेळी गोड पदार्थाची झिंग चढलेली असते. त्याशिवाय पानातील इतर पदार्थ दिसत नाही तर वाटीमागे असलेलं ते एवुढंस मीठ काय दिसणार?

पण जेव्हा तोच गोड पदार्थ खाऊन तड लागते ना तेव्हा पाण्याच्या ग्लास मध्ये लिंबाची फोड पिळली जाते आणि हात आपसूक मीठ शोधायला लागतो. कारण त्याशिवाय खाल्लेलं अन्न पचणार कसं? म्हणून देवाने वाढलेल्या ह्या आयुष्यरूपी पानात प्रत्येक व्यक्तीला महत्व असतं आणि ते द्यावं. आपल्याला ती व्यक्ती आवडो की न आवडो.

आयुष्यात आलीय ना म्हणजे नक्कीच मागील जन्माचा संबंध असतो आणि मिठासारखी माणसं तर नक्कीच ओळखावी. भलेही ती तुमच्या आयुष्यात महत्वाचे नसतीलही पण निदान वाईट तर नक्कीच करणार नाहीत.


स्वतः बरोबरच
कुटूंबाची काळजी घ्या.

स्वस्थ रहा, मस्त रहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *